बेळगाव : कर्जाच्या वादातून एका युवकाचे अपहरण करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका माजी मंत्र्यांच्या साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी हा प्रताप केल्याचे समजते.
बंदेनवाज नामक इसमाने एका माजी मंत्र्यांच्या मालकीच्या साखर कारखान्याकडून ऊसतोडणीसाठी 4 लाख रुपयांचे आगाऊ कर्ज घेतले होते. मात्र, आगाऊ रक्कम घेतल्यानंतरही तो ऊसतोडणीचे काम करण्यास टाळाटाळ करत होता. त्यामुळे कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी 4 लाख रुपयांची वसुली करण्यासाठी त्याचा ट्रॅक्टर आणि टिपर जप्त करण्याचा इशारा दिला होता. इतके करूनही बंदेनवाज हा ईशारा वजा धमकीला भीक घालत नव्हता. यामुळे त्याला दम देण्यासाठी कारखान्यातील 20 हून अधिक कर्मचाऱ्यांनी बंदेनवाजच्या भावाला उचलून एका निर्जन ठिकाणी नेऊन धोपटल्याचे बोलले जाते. रामदुर्ग शहरात घडली आहे.
मात्र, बंदेनवाजचा भाऊ बाशा याचे रामदुर्ग शहरातून अपहरण आणि मारहाण या वृत्ताला अद्याप ठोस दुजोरा मिळालेला नाही. पण, या भागातील टपरीवर घटनेबद्दल बारीक आवाजात कुजबुज कानी पडल्याचे सांगण्यात येते.
