धारवाड : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तिघा अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
अन्वर इब्राहिम वटणाळ (वय 13), सुभानी इसाक बागजीकोप्प (वय 12) आणि मेहबूब सुभानी दादापीर वटनाळ (वय 15) अशी पाण्यात बुडून मरण पावलेल्या मुलांची नावे आहेत.
धारवाड तालुक्यातील सिंगनहळ्ळी गावाजवळील करेम्मा तलावात शनिवारी ही घटना घडली आहे.
मेहबूब आणि अन्वर हे सख्खे भाऊ असून ते सिंगनहळ्ळी गावचे रहिवासी होते. तर सुभानी हा बैलहोंगल तालुक्यातील रहिवासी असून उन्हाळी सुट्टी घालविण्यासाठी तो नातेवाईकांकडे आला होता.
उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने तिघेही मित्र दुपारच्या सुमारास करेम्मा तलावात पोहण्यासाठी गेले होते. पाण्यात मौज करताना त्यांना तलावातील पाण्याच्या खोलीचा आला नाही आणि पाण्यात बुडताना एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिघेही पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सायंकाळपर्यंत मुले घरी परतली नसल्याने चिंताग्रस्त पालकांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी ही दुर्घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांच्या मदतीने तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या प्रकरणी गरग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
#3boysdied
#drowninpond
#dharwad