बेळगाव : निपाणी तालुक्यातील आडी येथील संजीवनगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्यावतीने अधिकमासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य दत्तयाग सोहळ्याला रविवारी भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. परमपूज्य परमात्मराज महाराज तथा श्री देवीदास महाराज यांच्या पावन उपस्थितीत आणि हजारो भाविकांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला.
यावेळी मार्गदर्शन करताना परमपूज्य परमात्मराज महाराज म्हणाले की, आध्यात्मिक कार्यक्रमात केवळ उपस्थिती महत्त्वाची नसून मनःपूर्वक सहभाग अधिक महत्त्वाचा असतो. शरीर कुठेही असले तरी मन अध्यात्म, आत्मचिंतन आणि उन्नतीच्या दिशेने केंद्रित असावे. अहंकार, मत्सर, द्वेष आणि नकारात्मक विचारांचा यज्ञाग्नीत त्याग करून आत्मोन्नतीचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.
संजीवनगिरीच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात विधिवत देवतांचे आवाहन, पूजन आणि संकल्प यांसह यज्ञविधींना प्रारंभ झाला. वैदिक मंत्रोच्चार आणि अखंड दत्तनामाच्या गजराने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या यज्ञाचे प्रमुख पौरोहित्य श्यामभटजी मांगुर, दिगंबर जोशी (नृसिंहवाडी) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
सोहळ्यास महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील, जयश्री जारकीहोळी, बीडीसीसी संचालक अमरनाथ जारकीहोळी, हिरा शुगरचे माजी संचालक प्रल्हाद पाटील, नितीन दिंडे, प्रताप ऊर्फ भैया माने, उद्योजक सचिन शिरगांवकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.
याशिवाय विविध जिल्ह्यांतील महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, डॉक्टर, अभियंते, पत्रकार आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी दत्तयागात सहभागी होत धार्मिक वातावरणाचा अनुभव घेतला.
सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांना विशेष तयार करण्यात आलेले पवित्र दत्तयंत्र कार्ड वितरित करण्यात आले. या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दत्तयागासाठी उभारण्यात आलेली यज्ञकुंडांची आकर्षक मांडणी आणि पारंपरिक पद्धतीने सजविण्यात आलेला मंडप हे विशेष आकर्षण ठरत आहे. केळीचे खांब, आंब्याच्या डहाळ्या, फुलमाळा आणि विविध धार्मिक सजावटींनी परिसराला देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे. यज्ञकुंडांजवळ काढण्यात आलेल्या रंगीबेरंगी रांगोळ्यांनीही भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
दोन दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात होम-हवन, नामस्मरण, विविध धार्मिक विधी आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्त्री-पुरुष, आबालवृद्ध तसेच सर्व जाती-धर्मांतील भाविकांच्या मोठ्या सहभागामुळे सामाजिक समरसता आणि आध्यात्मिक ऐक्याचे दर्शन घडत आहे. या दुर्मिळ आध्यात्मिक पर्वामुळे आडी परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.